29/04/2026
उत्पन्नाची टांकसाळ, तरीही सुविधांची वानवा, सावंतवाडी रेल्वे स्थानकाची कोकण रेल्वेकडून उपेक्षा!
निसर्गरम्य पर्यटन आणि ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी शहराला जोडणारे रेल्वे स्थानक कोकण रेल्वेसाठी उत्पन्नाची मोठी खाण ठरत आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न आणि लाखोंची प्रवासी संख्या असूनही प्रवाशांच्या पदरी मात्र निराशाच पडत आहे. २०१५ मध्ये भूमिपूजन होऊनही टर्मिनसचे स्वप्न अद्याप कागदावरच असून, सुविधांबाबत कोकण रेल्वे महामंडळ आणि रेल्वे बोर्डाची सापत्न वागणूक कायम असल्याची संतप्त भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
तळकोकणातील दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या प्रमुख तालुक्यांसाठी सावंतवाडी रेल्वे स्थानक अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या या स्थानकावरून शिरोडा बीच, आंबोली हिलस्टेशन, वेंगुर्ला बंदर या पर्यटनस्थळांसह धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्यांची वर्दळ मोठी असते. सावंतवाडीची लाकडी खेळणी आणि गंजिफा कला देश-विदेशात प्रसिद्ध असल्याने, कोकण रेल्वेशी जोडल्या गेलेल्या या शहराचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
*टर्मिनसचे भिजत घोंगडे.*
कोकणात येणारी वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन केवळ कोकणासाठी स्वतंत्र गाड्या सोडता याव्यात यासाठी २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तसेच आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे थाटामाटात भूमिपूजन झाले. मात्र, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि महामंडळाच्या उदासीनतेमुळे टर्मिनसचे काम रखडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, डिसेंबर २०२५ मध्ये *कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चक्क 'सावंतवाडी टर्मिनसचा पुरावा द्या',* असा अजब सवाल प्रवासी संघटनेला केल्याने प्रशासनाची अनास्था उघड झाली.
*उत्पन्नात घसघशीत वाढ, तरीही टाळाटाळ..?*💹
माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, सावंतवाडी स्थानक महसुलाच्या बाबतीत आघाडीवर आहे,
*आर्थिक वर्ष २०२४-२५:* या वर्षात स्थानकाचे उत्पन्न १६ कोटी १६ लाख रुपये होते. एकूण ७ लाख ९९ हजार प्रवाशांनी (प्रतिदिन सरासरी २,१९१) या स्थानकाचा वापर केला.
*आर्थिक वर्ष २०२५-२६:* या वर्षी उत्पन्नात १२.७९ टक्क्यांनी वाढ होऊन ते १७ कोटी ८२ लाखांवर पोहोचले आहे. प्रवासी संख्येतही १२.४१ टक्क्यांची वाढ झाली असून, तब्बल ८ लाख ६२ हजार २२ प्रवाशांनी (प्रतिदिन सरासरी २,३८६) येथून प्रवास केला.
इतके भरघोस उत्पन्न देऊनही महामंडळ साध्या प्रवासी सुविधा देण्यास टाळाटाळ का करत आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
प्रवासी संघटनेच्या लढ्याला यश.✊
सुविधांच्या अभावाविरोधात कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने (सावंतवाडी) सातत्याने आंदोलने आणि पाठपुरावा केला. या रेट्यामुळे काही सकारात्मक बदलही दिसून आले आहेत.
१. वांद्रे-मडगाव द्विसाप्ताहिक गाडीला थांबा देण्यात आला तसेच नागपूर-मडगाव एक्स्प्रेसचा थांबा पूर्ववत करण्यात आला आहे.
२. पीआरएस (PRS) सुविधा पूर्णवेळ सुरू करण्यात आली असून टर्मिनसला जोडणाऱ्या रस्त्याचे कामही पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली आहे.
३. अलीकडेच डिजिटल इंडिकेटर कार्यान्वित झाले असून प्रवाशांसाठी लिफ्टचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच, निवारा शेडचे कामही लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे.
नव्या थांब्यांना रेल्वे बोर्डाचा 'लाल कंदील'🛑, कोकण रेल्वे महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह..?❓
कोरोना काळात रद्द करण्यात आलेले 'राजधानी' आणि 'गरीब रथ' एक्स्प्रेसचे थांबे अद्याप पूर्ववत झालेले नाहीत, हा कोकणवासीयांवर अन्याय आहे. १२ जुलै २०२५ च्या पत्रानुसार, कोकण रेल्वेने सावंतवाडीसाठी काही नव्या गाड्यांच्या थांब्यांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. मात्र, रेल्वे बोर्डाच्या लालफीतशाहीत हा प्रस्ताव अडकून पडला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील इतर स्थानकांना नवीन थांबे मिळत असताना, भरघोस उत्पन्न देणाऱ्या सावंतवाडीलाच उपेक्षित का ठेवले जाते? हा तिढा अद्याप सुटलेला नाही. आतातरी रेल्वे बोर्ड, रेल्वे महामंडळ सावंतवाडीला न्याय देईल का, अशी भाबडी आशा येथील जनता बाळगून आहे.
माहितीसाठी जनहितार्थ,
सागर तळवडेकर
उपाध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी.